महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पदमुक्त व्हायचं, अशी इच्छा त्यांनी नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीदरम्यान व्यक्त केली असल्याची माहिती राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते. हेही वाचा - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा काय म्हणाले अरविंद सावंत? देर आये दुरुस्त आये! राज्यपालांनी घटनाबाह्य ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याचं पापक्षालन राजीनाम्याने होणारं नाही. मात्र, हे उशीरा सुचले शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली. राज्यपालांनी अनेक घटनाबाह्य गोष्टी केल्या आहेत. त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, ती कोणाच्या शिफारसीवरून दिली. हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं नाही, असेही ते म्हणाले. मुळात अशा परिस्थिती सर्वाधिक संख्या असेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर राजकीय पक्ष बैठक घेऊन नेता निवडतात. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली, असा कोणताही नेता निवडला गेला नाही. तरी त्यांना कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हेही वाचा - “हे राज्यपाल उद्या जाण्याऐवजी…” राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याच्या इच्छेवर काँग्रेची पहिली प्रतिक्रिया राज्यपालांनी नेमकं कायम म्हटलं आहे? ''महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.