आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जांवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २ ऑक्टोबरला एनसीबीनं कॉर्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यामधून या दोघांसह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन सहआरोपींना आज विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मात्र, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू असताना यादरम्यान अरबाज मर्चंट यानं त्याच्या वडिलांशी बोलताना आर्यन खानविषयी व्यक्त केलेल्या भावना समोर आल्या आहेत.

अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट यांनी अरबाजसोबत झालेल्या चर्चेचा तपशील एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. ते म्हणाले, “अरबाज आर्यन खानसाठी चिंतित होता. या निर्दोष मुलांना खटला चालवण्यापूर्वीच शिक्षा दिली जाऊ नये. मी जेव्हा त्यांना भेटून निघालो, तेव्हा अरबाजनं आर्यनविषयी बोललेले शब्द ऐकून माझं मन हेलावून गेलं. अरबाजसाठी त्यांची मैत्री ही सर्वोच्च आहे”, असं असलम मर्चंट म्हणाले.

“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी!

काय म्हणाला अरबाज?

असलम मर्चंट यांनी सांगितल्यानुसार, अरबाज मर्चंटनं त्यांना आर्यनसोबत असलेल्या मैत्रीविषयी भावनिक होऊन सांगितलं. अरबाज म्हणाला, “पप्पा, मी आर्यनला इथे जेलमध्ये एकट्याला सोडणार नाही. आर्यनला कोणतीही इजा होता कामा नये. आम्ही सगळे इथे सोबत आलो आहोत. आम्ही इथून सगळे सोबतच निघू”, असं अरबाजनं सांगितल्याचं असलम मर्चंट यांनी म्हटलं आहे.

Mumbai Drugs Case : अखेर विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून दोघा आरोपींना जामीन मंजूर!

आर्यन खान आजही तुरुंगातच!

दरम्यान, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मात्र, न्यायालयाचं आजचं कामकाज संपल्यामुळे उर्वरीत सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला आहे.