बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी दाखल केलेले जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यापाठोपाठ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असली, तरी इकडे एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान आर्यन खान किंवा इतर कोणत्याही आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष वा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं नव्हतं.

याआधी ७ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी!

विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामिनीसाठी याचिका करण्यात आली. तिथे तातडीने सुनावणी घेतली जावी, यासाठी आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे प्रयत्नशील होते. जेणेकरून लवकरात लवकर त्याला जामीन मिळवता यावा. मात्र, न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जासाठीच्या सुनावणीसाठी थेट मंगळवार अर्थात २६ ऑक्टोबरची तारीख दिल्यामुळे त्याचा मुक्काम आधीच तुरुंगात वाढल्यानंतर आता विशेष एनसीबी न्यायालयानं थेट ३० ऑक्टोबरपर्यंत त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.