भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नसून ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याचं म्हटलंय. तसेच या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ७ प्रश्न विचारलेत. यात त्यांनी राम मंदिर थट्टेपासून याकुब मेननपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २५ वर्ष सडल्यासारखं वाटतं. म्हणून ही शिवसेना निर्माल्य झालीय, असाही टोला शेलारांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष शेलार म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी पडलीय का असं वाटतंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत भाजपाची युती ज्वाजंल्य हिंदुत्वाची सुवर्ण फुले होती. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीच हिंदुत्वाची ज्वाजंल्य सुवर्ण फुले निर्माल्य वाटत आहे. त्या काळात काँग्रेसकडून देशात मुस्लिमांचं होणारं लांगुलचालन झालं, शहाबानो खटल्यात संविधानाचे धिंडवडे काढले गेले. बाळासाहेबांसोबतची आमची युती वैचारिक युती होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २५ वर्ष सडल्यासारखं वाटतं. म्हणून ही शिवसेना निर्माल्य झालीय.”

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विचारलेले ७ प्रश्न

१. आजूबाजूच्या राष्ट्रातील हिंदूंना भारतात शरण येण्यासाठी जो सीएएचा कायदा झाला त्याला शिवसेनेने विरोध का केला?

२. देशात बांग्लादेशी किंवा अन्य कुठलाही नागरिक असता कामा नये म्हणून एनआरसी झाली पाहिजे ही चर्चा होती. त्या एनआरसीला शिवसेनेने विरोध का केला?

३. १९९२-९३ च्या दंगलीनंतर झालेल्या बॉम्बस्फोटात याकुब मेननचा सहभाग सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्या याकुब मेननला फाशीची शिक्षा नको असं म्हणणारा मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात का आहे?

४. शर्जिल उस्मानीचं समर्थन करणारे मंत्रिमंडळात कसे?

५. राम मंदिराची थट्टा शिवसेनेचे प्रवक्ते का करतात?

६. राम जन्मभूमीबाबत जागेवरून शिवसेनेचे प्रवक्ते अनाठायी वादळ का उठवतात?

७. जय श्रीरामला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी तुम्हाला नेत्या का वाटतात?

आजच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

“मोदी सुद्ध काश्मीरमध्ये लाल चौकात जाऊन भारताचा झेंडा लावत होते तेव्हा तुम्ही कोठे होता?”

“हिंदुत्ववादी कोण हा प्रश्न विचारायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला विचारावं लागेल की आम्ही कारसेवा करत होतो तेव्हा तुम्ही कोठे होता? ३७० कलमाच्या विरोधात लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी सुद्ध काश्मीरमध्ये लाल चौकात जाऊन भारताचा झेंडा लावत होते तेव्हा तुम्ही कोठे होता? ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला त्यावेळी तुम्ही कोठे होता? हा प्रश्न शिवसेनेला विचारावा लागेल. आजच्या शिवसेनेने याचं उत्तर द्यावं,” असंही आशिष शेलार म्हटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar ask 7 questions to uddhav thackeray shivsena pbs
First published on: 25-01-2022 at 04:27 IST