शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असताना आशिष शेलार यांनी याबाबत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही महिलेची बदनामी केली नसून ही खोटी तक्रार आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आशिष शेलार यांनी यावेळी केला. तसेच, तपासामध्ये पूर्ण सहकार्य करणार असून न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.

“सत्तेच्या दुरुपयोगाचं हे जिवंत उदाहरण”

“ही तक्रार खोटी, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया खोटी. या राज्यात पोलीस बळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग केवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद, बदनामीकारक वक्तव्य, छेडछाड किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दबावतंत्र करून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

सत्य बाहेर येईलच, पण…

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना यांचं नाव न घेता त्यांना आव्हान दिलं आहे. “सत्य बाहेर येईलच. पण अशा पद्धतीची मुस्कटदाबी आणि दादागिरी करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की भाजपा कधी दबला नाही, झुकला नाही. आशीष शेलारचा तर सवालच नाही. तुमच्या नाकर्तेपणाविरुद्धचा संघर्ष अजून कडवा, प्रखर करीन आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने चालू ठेवेन”, असं ते म्हणाले.

नायर रुग्णालयातील प्रकारावरून विचारला सवाल

यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना नायर रुग्णालयातील प्रकारावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. “तोच प्रश्न पुन्हा विचारेन, नायर रुग्णालयात चार महिन्यांच्या बाळाला पाऊण तासाच्या वर औषधोपचार का मिळाले नाहीत? त्याचा, त्याच्या वडिलांचा, त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू का झाला? रुग्णांना विलंबाने मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत तुम्ही तोंड उघडणार आहात का? तुमचा अहंकार मोठा की सामान्य मुंबईकरांच्या झालेल्या मृत्यूचं दु:ख मोठं हे संवेदनशील सत्ताधाऱ्यांना समजावं लागेल. त्याविरोधातला कडा संघर्ष चालू राहील”, असं ते म्हणाले.

निवडणुकीत योग्य वेळी भाष्य करेन

दरम्यान, ही कारवाई राजकीय हेतूने झाली असं वाटतं का, या प्रश्नावर आशिष शेलार यांनी राजकीय उत्तर देणं टाळलं. “आज मी कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही. लोकांनी आपापले अर्थ काढले आहे. मानहानीच्या नोटिसा मला पाठवत आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दोन दिवस दारोदार पळापळ सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत योग्य वेळी मी भाष्य करीन, भंबेरी कुणाची उडाली आहे हेही सांगेन आणि यामागचा बोलवता धनी कोण हेही स्पष्ट करीन”, असं ते म्हणाले.

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.

“…एवढे तास कुठे निजला होतात”, आशिष शेलारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर महापौर पेडणेकरांची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

आशिष शेलार म्हणाले होते, “७२ तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात? झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?”