महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यानंतर आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी थेट विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजपाच्या या आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याचं सचिवांच्या लक्षात आणून दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित केलं. या विरोधात १२ आमदारांतर्फे आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला आला. यात सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले. "आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना दिली" आज याबाबत १२ आमदारांच्या वतीने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना दिली. तसेच सोबत निवाड्यांची प्रतही जोडण्यात आली. हेही वाचा : “शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊतांचा जन्म १९६१ चा, तुम्ही…”, आशिष शेलारांचा हल्लाबोल न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे. याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे, अशी भूमिका आमदार शेलार यांनी मांडली.