निर्णय घेत नाहीत वा हाताला लकवा लागला की काय, अशी शंका उपस्थित करण्यापर्यंत मजल गेली असली तरी गेल्या साडे तीन वर्षांंत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिदिन सरासरी २६ फाईल्सचा निपटारा केला आहे. गेल्या १५ वर्षांंत काँग्रेसच्या चार मुख्यमंत्र्यांमध्ये फाईल्स हातावेगळ्या करण्यामध्ये अशोक चव्हाण हे आघाडीवर राहिले आहेत.
काँग्रेस राजवटीत १९९९ पासून विलासराव देशमुख (दोनदा), सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे चार मुख्यमंत्री झाले. निर्णय होत नाहीत वा कामे मार्गी लागत नाहीत याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जास्त टीका झाली. कामे होत नसल्याबद्दल टीका करताना हाताला लकवा लागला की काय, अशी शंक घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनीही निर्णय प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.