मुंबई: महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली, या प्रकरणात राजकीय व्यक्तींचीही नावे घेतली जात असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या प्रकरणात राज्यातील चार मंत्र्यांचा थेट सहभाग असून खरातकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल, असा दावा केला आहे.

अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचे पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचे पटोले म्हणाले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे राजकीय गुंड असतील किंवा भोंदू बाबा असतील हे समोर येत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सगळे घडत आहे. राज्यात भीती नावाचा प्रकार संपला आहे. त्यामुळे अशा घटना यापुढेही महाराष्ट्रात सुरू राहतील, असा आरोप पटोले यांनी केला.

खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर – रोहित पवार

खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आले आहेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. त्यांची नावे तपासातून वगळण्यासाठी वेगळे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीवरून उपरोधिक टोला लगावताना रोहित पवार यांनी या प्रकरणातले १ टक्के सत्यही अद्याप समोर आले नाही.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे रॅकेट कार्यरत असून मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून बाहेर काढे जात असल्याचा दावा त्यांनी केला.