बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे, हा देशाचा अपमान असल्याचे वादग्रस्त ट्विट करून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी नव्या वादाला तोंड फोडले . बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला आहे. यापूर्वीही बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या शासनाच्या निर्णयावरून अनेक वाद निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनेने सरकारच्या या निर्णयाला प्रखर विरोध दर्शविला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या विरोधात सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याचाही दिग्विजय सिंह यांनी निषेध केला असून  त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करत असल्याचा आरोप केला आहे.