वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या.

मंगळवारी सकाळी नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अद्याप आगीत जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी पोहोचले असून अरुंद रस्त्यांमुळे अडथळे येत आहेत.

दरम्यान, वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते.