लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढत आहे. ताफ्यातील एकूण बसच्या तुलनेत सुमारे ७३ टक्के बसगाड्या कंत्राटदारांच्या आहेत. परंतु, यापैकी बहुसंख्य बसगाड्या नादुरूस्त असून, योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या सतत बिघडत आहेत. त्याचबरोबर अधूनमधून या बसगाड्यांना आग लागत आहे. यामुळे कंत्राटदारांच्या बसगाड्या बेस्टसाठी तापदायक ठरू लागल्या आहेत.
बेस्ट उपक्रमात २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसगाड्यांबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या. तसेच मागील काही कालावधीपासून बसगाडीला आग लागणे, बस रस्त्यात बंद पडणे, विद्युत बॅटरी पेट घेणे अशा घटना घडत आहेत.
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील महर्षी कर्वे मार्गावर बेस्टच्या बस गाडीला नुकतीच भीषण आग लागली होती. बसमधील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. चालकाने प्रसंगावधानता राखून सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी पद्धतीने बस चालवणे बंद करणे आवश्यक आहे. बेस्ट उपक्रमातील कंत्राटदार बसची देखभाल-दुरूस्ती करीत नाहीत. त्यामुळे वारंवार बसगाडीला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. देखभाल-दुरुस्ती अभावीच या बस रस्त्यावर धावतात. ज्या कंत्राटदारांच्या बसगाडीला आग लागली त्याचे नाव काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे. परंतु, बेस्ट उपक्रम कंत्राटदारांविरोधात कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. -शशांक राव, सरचिटणीस, दि बेस्ट वर्कर्स युनियन
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विद्युत बसगाडीची संख्या वाढत आहे. या बसची बॅटरी वारंवार चार्जिंग केल्याने लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच बॅटरी गरम होऊन अचानक आग लागते. बेस्टच्या दुर्लक्षपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. -रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी