मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांवर आता मोफत उपचार करण्यात येणार आहेत. केईएम, नायर, सिद्धार्थ, भगवती, राजावाडी, शताब्दी, अगरवाल आदी रुग्णालयामध्ये त्यांच्यासाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
बेस्ट उपक्रम महापालिकेचा एक अविभाज्य घटक असून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महापालिकेचीही जबाबदारी आहे. पालिका रुग्णालयात उपचारासाठी या कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागत होते. पैशांअभावी चाचण्याही करता येत नव्हत्या. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांवर कॅशलेस पद्धतीने उपचार करावे, अशी सूचना बेस्टचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी केली होती.
या संदर्भात अलिकडेच पालिका रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बेस्ट प्रशासनाची बैठक पार पडली. रुग्णालयाचे उपअधिष्ठाते आणि वैद्यकीय अभिलेख अधिकाऱ्यांनी समन्वय साधून याबाबत निर्णय घ्यावे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.