मुंबई: बेस्ट बसचे प्रवास भाडे आजपासून वाढविण्यात आले असून सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेत जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर २ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या सुधारित प्रवाभाड्याची अंमलबजावणी ९ मेपासून करण्यात आली. जे बसमार्ग मुंबई महापालिकेच्या हद्दीतून इतर महापालिकांच्या हद्दीत प्रवर्तित होतात त्या बसमार्गावरील प्रवासभाड्यामध्ये म्हणजेच मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेर पथकर नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विना-वातानुकूलित आणि वातानुकूलित बस सेवेवर २ रुपये अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. बेस्टच्या तिकीट यंत्रणेत तसे बदल करण्यात आले आहेत.

बेस्ट उपक्रमाचे अनेक बसमार्ग मुंबईच्या बाहेरही जात असतात. पश्चिम उपनगरात भाईंदरपर्यंत तर पूर्व उपनगरात वाशीपर्यंत बसगाड्या जातात. मुंबई बाहेर असलेल्या पथकर नाक्यांवर बेस्टच्या गाड्यांवर प्रतिफेरी १५० रुपये इतका पथकर भरावा लागतो. त्यामुळे वार्षिक ८ कोटी रुपये भार बेस्टवर येतो. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बेस्टची सेवा ही केवळ मुंबईपर्यंत असली तरी काही बसमार्ग हे मुंबईला लागून असलेल्या महापालिकांच्या हद्दीत जातात. मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत बेस्टच्या बसगाड्या जातात. त्याला प्रवाशांकडून प्रतिसादही असतो. मात्र या प्रवाशांना आता २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. बेस्टच्या गाडयांना पथकर माफ करावा, अशी मागणी बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. मात्र अद्याप ती मागणी मान्य झाली नाही.एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. तर दुसरीकडे बेस्टची वार्षिक तूटही वाढत आहे. त्यामुळे संचित तूट आठ हजार कोटींवर गेली आहे.

बसताफा वाढवण्याचा संकल्प बेस्ट उपक्रमाने केला असला तरी हे उद्दीष्ट्य साध्य होऊ शकले नाही. दिवसेंदिवस रोडावत चाललेली प्रवासी संख्या, कमी होत गेलेले उत्पन्न, जुन्या गाड्य़ा भंगारात गेल्यामुळे कमी झालेला ताफा, बसगाड्य़ा कमी झाल्यामुळे सेवेवर झालेला परिणाम, कर्जाचा वाढत चाललेला डोंगर आणि वाढत चाललेली तूट अशा दुष्टचक्रात बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांत अडकला आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी बसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र बेस्टचा ताफा पुरेसा नसल्यामुळे आता भाडे वाढल्यानंतरही प्रवासी बसची वाट बघणार का याबाबत आता उत्सुकता आहे.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता बेस्टकडे सध्या किमान साडे पाच हजार गाड्या असायला हव्यात. त्या सध्या केवळ २७८४ गाड्या आहेत. त्यातही बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्या केवळ ६६५ आहेत. त्यामुळे बेस्टच्या सेवेवर परिणाम झाला आहे. पण सेवा देत नसताना भाडेवाढ कशी करता येईल, असाही प्रश्न प्रवासी विचारत आहेत.