महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे भेट घेतली. त्यावेळी दोघांतर्फे भुजबळांचे अभिनंदन करण्यात आले.
मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. “महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला मंत्रीमंडळाने ठरवले होते की हे बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असे सांगितले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये ८०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागलं,” असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.
“आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळ्यात यावं यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं आहे. ईडीची कारवाई ही महाराष्ट्र सदन प्रकरणातून पैसे मिळाले यातून ही केस बांधली गेली आहे. अतिशय विनम्रपणे संयम करुन आम्ही या यशाचा स्विकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही. कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं. साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये, ये तो आपकी जनता की दुआयें है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,” असे म्हणत भुजबळांनी सर्वाचे आशिर्वाद सोबत असल्याचे म्हटले आहे.
साजिशें लाखो बनती है…; महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रियाhttps://t.co/NoGJgr7LBH < येथे वाचा सविस्तर वृत्त #ChhaganBhujbal #MaharashtraSadan #NCP @ChhaganCBhujbal @NCPspeaks pic.twitter.com/UmJWwgVLRi
— LoksattaLive (@LoksattaLive) September 9, 2021
आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधी महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध केला होता. आपल्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचा दावा करत भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी पैसे मिळाले होते याचा पुरावा असल्याचा दावा एसीबीतर्फे करण्यात आला होता.