मुंबई: देवनार येथील कचराभूमीवर येत्या दोन वर्षात बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याकरीता महानगर गॅस कंपनीला कचराभूमीवर काही भूभाग २० वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. या जागेवर कंपनीच्या वतीने एक हजार मेट्रीक टन कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने महानगरगॅस कंपनीला देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे तब्ब्ल १८ एकर क्षेत्रफळाची १३२ कोटींची जमीन कंपनीला केवळ १४ लाख रुपयांत दिली जाणार आहे. तर कंपनीच्या खर्चाने मोफत कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार अशा दोनच कचराभूमी आहेत. मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या एकूण सुमारे साडे सहा हजार मेट्रीक टन कचऱ्यापैकी ६०० मेट्रीक टन कचरा देवनार कचराभूमीवर तर सुमारे पाच हजार मेट्रीक टन कचरा कांजूरमार्ग कचराभूमीवर जातो.
देवनार कचराभूमीची जमीनीपैकी ११० हेक्टर जमीन धारावी पुर्नविकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्याकरीता या जमिनीवरील जुना कचरा साफ करण्यात येणार आहे. तर कांजूरमार्ग कचराभूमी संरक्षित वनक्षेत्र घोषित केल्यामुळे या दोन्ही कचराभूमी पालिकेच्या हातून जाणार आहेत. त्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प कुठे उभारायचा असा प्रश्न मुंबई महापालिकेपुढे होता. त्यातच आता देवनारच्या कचराभूमीपैकी एकूण १८ एकर जागा ही महानगर गॅस कंपनीला बायोगॅस प्रकल्पासाठी सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. त्यामुळे रोजच्या सुमारे साडेसहा हजार मेट्रीक टन कचऱ्यापैकी एक हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई महानगरपालिका व महानगर गॅस लिमिटेड यांच्यात १००० मेट्रीक टन कचऱ्यापासून प्रतिदिन बायोगॅस प्रकल्पाबाबत जून २०२३ मध्ये सामंजस्य करार केला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. पाचशे मेट्रीक टन प्रतिदिन अशी या दोन्ही प्रकल्पांची प्रत्येकी क्षमता असेल. पहिल्या टप्प्याकरीता ३२,३७५ चौ.मी(८एकर) एवढी जमीन व दुसऱ्या टप्प्यासाठी ४०,४६८ चौ. मी (१० एकर) जमीन २५ वर्षांसाठी दिली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याची जमीन उपलब्ध असून तिथे लगेचच काम सुरू होऊ शकणार आहे. दीड वर्षात हा प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट्य आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जमीनीवरील जुना कचरा साफ करून दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
असा असेल प्रकल्प | टप्पा १ | टप्पा २ |
क्षमता | ५०० मेट्रीक टन प्रतिदिन | ५०० मेट्रीक टन प्रतिदिन |
क्षेत्रफळ | ३२,३७५ चौ. मी.(८ एकर) | ४०,४६८ चौ.मी. (१० एकर) |
भांडवली खर्च | ३०० कोटी | ३१५ कोटी |
बायोगॅसची निर्मिती | १८ टन प्रतिदिन | १८ टन प्रतिदिन |
कंपनीला मिळणारे वार्षिक उत्पन्न – ७३ कोटी ६५ लाख
भूभागाची एकूण किंमत – १३२ कोटी ४२ लाख ६२ हजार ९७६ रुपये
२० वर्षांकरीता एकत्रित भूईभाडे – १४ लाख ५६ हजार रुपये
२५ वर्षांकरीता भाडे – १८ लाख २१ हजार ११२ रुपये