मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण रखडले असून जानेवारीत या कामाचा श्रीगणेशा करण्यात येणार होता. मात्र, काही कारणांमुळे हे काम रखडले असून आता १ एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतीमधील रहिवासी, तसेच धोकादायक, अतिधोकादायक इमारत कोसळल्यास त्यातील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी दुरुस्ती मंडळाने ५६ संक्रमण शिबिरे उभारली आहेत. या संक्रमण शिबिरात अंदाजे २१ हजार १३५ गाळे आहेत. मात्र यातील अनेक गाळय़ांमध्ये घुसखोरी झाली आहे. या घुसखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र यात दुरुस्ती मंडळाला यश आलेले नाही. संक्रमण शिबिरात आजघडीला आठ हजारांहून अधिक घुसखोर वास्तव्यास असल्याचे समजते. हे घुसखोर दुरुस्ती मंडळ आणि राज्य सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने अखेर दंडात्मक कारवाई करून घुसखोरांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुरुस्ती मंडळामार्फत संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर घुसखोरांना अधिकृत करताना, त्यांचे पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसन करताना पात्रता निश्चिती योग्य प्रकारे व्हावी, किती घुसखोर, किती अधिकृत रहिवासी याची योग्य माहिती असावी यादृष्टीने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी एका खासगी कंपनीला निविदे प्रक्रियेअंती देण्यात आली आहे. या कामाला आतापर्यंत सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले. आता मात्र हे काम मार्गी लागण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. गुरुवारी यासंबंधी एक बैठक पार पडली. या बैठकीत १ एप्रिलपासून बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विलंबास कारण.. दुरुस्ती मंडळाने कंत्राटदाराची नियुक्ती करून कार्यादेश दिले. जानेवारीत या कामाला सुरुवात होणार होती. मात्र, या कंत्राटदाराला मदत करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कंत्राटदाराची नियुक्ती काही कारणाने रद्द करण्यात आली. त्यानंतर नव्याने या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात वेळ गेला. त्यामुळे सर्वेक्षण रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.