मुंबई : महाराष्ट्रात भाजप सरकार पाडणार नाही, पण अंतर्विरोधामुळे पडले, तर भाजप पर्यायी सरकार देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. आम्ही २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यात भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा आत्मविश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार पाडण्याची मोहीम भाजप हाती घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना फडणवीस यांनी त्याचा ठामपणे इन्कार केला. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित मतेही नोटा पेक्षाही कमी असल्याने फडणवीस यांनी त्यांची खिल्ली उडविली आणि काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरच लढविल्या जाणार आहेत.