काल बीकेसी मैदानात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन भाजपासह देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि राणा दाम्पत्य यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भाजपाने मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एक सभा आयोजित केली आहे. या सभेच्या माध्यमातून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा उल्लेख थुचाट सभा होती असा केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, राजकारणात सगळे पक्ष विचलित होत आहेत. कुणी संकल्प सभा आयोजित करतय तर कुणी झेंड्याचा रंग बदलतोय. सत्तेमध्ये बसलेल्यांना तर काहीच कळत नाही, सगळे विचलित आहेत. हनुमान चालीसा म्हटली तर त्यांना तुरुंगवास होतोय. पण औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नाही. हे कोणतं सरकार आहे? उद्धव ठाकरेंची कालची सभा पुचाट सभा होती आणि थू चाट सभा होती. म्हणजेच थुंकून चाटणे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी विखारी टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कामावर देखील तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, पैसे खायचे तर कुठे खायचे, नाल्यात खाल्ले, गटारात खाल्ले, कचऱ्यामध्ये खाल्ले, पेंग्विनमध्ये खाले आणि आता तर उंदरात पण पैसे खाल्ले. झोपडपट्टी आणि फुटपाथावर राहणाऱ्या राहणाऱ्या लोकांना उंदरांचा त्रास आहे. याबाबत तुम्ही काय उपाय योजना केल्या असा सवाल विचारला असता, त्यांनी सांगितलं की, एका वार्डात एका महिना अशाप्रमाणे दहा हजार उंदीर मारले. संबंधित उदरं मारायला १ कोटी खर्च झाले. उंदीर कसे मारले. तर पटकून मारले. मेलेले उंदीर कुठे ठेवले, तर जमीनीत पुरले. संबंधित जमीन कुठे आहे, तर त्यावर झाडं लावली. लावलेली झाडं कुठे आहेत. तर वादळामुळे पडली. त्याचा पंचनामा अहवाल कुठे आहे. तर वॉर्ड ऑफिसमध्ये आहे. पण गेल्या महिन्यात पाऊस पडल्याने ते कागदं वाहून गेली, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत टीका केली आहे.