मुंबई : अहंकारामुळे ठाकरे सरकारने शहाणपण गमावले असल्याची टीका करीत याचिकाकर्ते भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने महाविकास आघाडी सरकारचा हुकूमशाही निर्णय रद्द केल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे, असे सांगून शेलार म्हणाले, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणारा विधानसभेचा ५ जुलै २०२१ चा ठराव न्यायालयाने रद्दबातल केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय घटनाबाह्य, बेकायदा आणि तर्कहीन आहे, असे कडक ताशेरे न्यायालयाने सरकारवर ओढले आहेत. हा सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा ऐतिहासिक निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्वत:ची चूक सुधारण्याची एक संधी दिली होती व योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती; पण फक्त शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो; पण ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेले आहे. कोणत्याही चौकशीच्या व्यवस्था, देशातील किंवा राज्यातील प्रथा, परंपरा, सांविधानिक प्रक्रिया, सरकारला मान्यच नाहीत, असे हे स्वैर सुटलेले सरकार आहे.