गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसा पठणावरून सुरू असलेल्या महानाट्याचा दररोज नवनवीन अंक पाहायला मिळत आहे. शनिवारी राणा दाम्पत्यानं मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यापासून माघार घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. यावरून राज्यातलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. भाजपानं सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे.

“दगडाची भाषा दगडानं करू”

भाजपा आमदार नितेश राणे यांनी या सर्व घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू. दगडाची भाषा दगडानं करू आणि गोळ्यांची भाषा गोळ्यांनी करू. पण आम्हाला राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाहीये. मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते, नातेवाईक रस्त्यावर धिंगाणा घालत असतील तर राज्याच्या जनतेनं कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात कुणाकडून अपेक्षा ठेवावी?” असं नितेश राणे म्हणाले.

“पोलीस आयुक्तांचं सरकारसोबत काँट्रॅक्ट झालंय का?”

“काल मुख्यमंत्र्यांचे नातेवाई धिंगाणा घालत होते. मुख्यमंत्री रस्त्यावर येऊन शिवसेना कार्यकर्त्यांना भेटतात, पोलिसांवर दबाव टाकतात. याला काय म्हणायचं? तुम्हाला भाजपाच्या आंदोलनाची माहिती मिळाली की जमावबंदी लावता. मग काल का नाही मुंबईत जमावबंदी लागू केली? मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काय पेरोलवर ठेवलंय का? तुमचं सरकारसोबत काँट्रॅक्ट झालं असेल तर एकदाच सांगा. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवणं बंद करतो. कोल्हापुरात मला मारून टाकण्याचा प्रयत्न झाला. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसोबत तेच झालं”, असं राणे म्हणाले.

“शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा…”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी!

“मुंबईत गँगवॉर सुरू करायचंय का?”

“ही राजकीय लढाई राहिलीच नाहीये. इथे गँगवॉर सुरू झाला आहे. अघोषित गँगवॉर आहे हा. तुम्हाला दाऊद, छोटा शकील या लोकांना बाहेर काढायचं होतं. आता शिवसेनेच्या निमित्ताने तुम्हाला मुंबईत गँगवॉर सुरू करायचंय का? आणि आम्ही काय बघत बसायचं का? चालणार नाही”, असं देखील नितेश राणे म्हणाले.

“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!”

“आदित्य ठाकरंच्या दिशेनं दगड आले तर?”

“राज्यात आम्हाला जीवे मारण्यापर्यंत परिस्थिती जाणार असेल, तर प्रतिक्रिया येणार. तांडव होणार. तांडव झाल्यावर काय केसेस टाकायच्या त्या टाका. त्याला जबाबदार आम्ही नाही. आज रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. काल खार पोलीस स्टेशनच्या समोर काँक्रीटची वीट सोमय्यांवर टाकली जाते. पोलीस काय करत होते. उद्या शिवसेनेच्या दिशेने, वरून सरदेसाईंच्या दिशेने, आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड यायला लागले, तर काय करणार तुम्ही? त्यांच्याही रेंज रोव्हर आहेत ना. एकट्या मोहीत कंबोज यांचीच रेंज रोव्हर आहे का?” असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला.