महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपा शिवसेनेवर टीका करण्याची एक संधी सुद्धा सोडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी समाजमाध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेची स्तुती केली. “शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे.  राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील”, असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान शरद पवारांच्या वक्कव्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी टीका केली आहे.

राम कदम म्हणाले, “शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकिय हतबलता आहे. तसेच ही शरद पवारांची राजकीय अडचण आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकले नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे”

काय म्हणाले होते शरद पवार 

महाराष्ट्र शिवसेनेला अनेक वर्षे पाहतोय. देशात जनता पक्षाचे सरकार असताना त्यावेळी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सगळीकडे पराभव झाला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. त्या पक्षाने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला हा इतिहास विसरता येणार नाही. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना, असे कौतुकोद्गार पवार यांनी यावेळी काढले.

भविष्यातही महाविकास आघाडी!

दरम्यान, राम कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींंचे केलेले कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी_काँग्रेस पक्षाची राजकिय हतबलता असल्याचे कदम म्हणाले.

नरेंद्र मोदींंचे कौतुक करतांना संजय राऊत म्हणाले…

नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे, हे नाकारता येणार नाही असं शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मोदींचा चेहरा न वापरता भाजपाकडून निवडणूक लढण्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत असं मी मानतो. गेल्या सात वर्षात मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला यश मिळालं आहे, हे नाकारता येणार नाही”.

आणखी वाचा- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; शरद पवारांचं मोठं विधान

‘नरेंद्र मोदी देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थाबंत नाही. हे शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं”.

“मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.