उमाकांत देशपांडे, लोकसत्ता मुंबई : शिवसेनेने हिंदूत्व सोडले, आता भगवा ध्वजाचाही विसर पडेल व हिरवा झेंडा हाती घेतला जाईल, असे टीकास्त्र भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी लोकसत्ता ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सोडले. राज्यात भाजप आता युतीचे राजकारण करणार नसून स्वबळावर सत्ता मिळवेल, असे स्पष्ट केले. भाजपची मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि २०२४ च्या निवडणुकांची तयारी, युतीचे राजकारण, महाविकास आघाडी सरकारचे यशापयश आदी मुद्दय़ांवर रवी यांनी सविस्तर विवेचन केले. शिवसेनेशी युती होती, तेव्हाची भाजपची आणि राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता भाजपची ताकद वाढली असून कोणाशीही युती करून निवडणुका लढणार नाही, असे सांगून रवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये शिवसेनेशी युती केल्याने विधानसभेसाठीही केली होती. पण आता कोणाहीबरोबर न जाता स्वबळावरच सत्ता मिळवायची, असे भाजपने ठरविले आहे. शिवसेनेशी हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर युती होती. पण शिवसेनेने हिंदूुत्व सोडून सत्तेसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्यांबरोबर आणि अफझलखान व औरंगजेबाशी संगत केली आहे. त्यामुळे भगवा विसरून हिरवा झेंडा हाती घेतील, मुस्लाम धर्मीयांची टोपीही घालतील, अशी टिप्पणी रवी यांनी केली. भाजपने केंद्र सरकारच्या सर्व योजना व निर्णयांचा लाभ अल्पसंख्याक समाजाला दिला आहे, कोणताही भेदभाव केंद्र सरकार करीत नसून अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजनाही अमलात आणल्या आहेत. भाजप राष्ट्रहिताचा नेहमी विचार करते, पण मुस्लीम धर्मीय निवडणुकीत धर्माच्या मुद्दय़ाचा विचार करतात व भाजपबरोबर येत नाहीत, असे मत रवी यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे सरकार करोना उपाययोजनांसह सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. जनतेचा विश्वास भाजपबरोबर असून राज्य सरकारवर नाही. त्याचे प्रत्यंतर काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आले व पुढील निवडणुकांमध्ये येईल. मुंबई महापालिकेतही स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.