वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून संताप व्यक्त केला आङे. विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तिच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी पत्रातून केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो अशी झाली आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे. गुन्हेगारीचं साम्राज्या, भ्रष्टाचाराची दलदल वाढत सामान्य नागरिकांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्हीदेखील मुंबईचे रहिवासी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक ना एक दिवस उलांडणारच होती असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

पत्रात काय म्हटलं आहे?

“गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. तसंच ४० वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

“सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरत आहे. मुंबईबाहेरील लोकांच्या मताच्या लोभात अनधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानगी देत आहेत. मुंबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहेर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोसपणे सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतपणे हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे,” अशी खंत नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.

“वर्षभरापुर्वी मालाड मालवणीमध्ये घराचं वाढीव अनाधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असंच प्रकरण घडलं. या जळत्या चितांचा प्रकाश ही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का?,” अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.

“अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करु नका, असे आदेश आपण दिलेत. मात्र आयुक्त कारवाई करत नाहीत. अनाधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरत आहे. राजकीय आकसापोटी विरोधकांना अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता अनाधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी. अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठरावीक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल,” असा टोला त्यांनी लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitesh rane letter to maharashtra cm uddhav thackeray over illegal constructions sgy
First published on: 17-06-2022 at 16:39 IST