भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबईत येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. "उद्धव ठाकरेंचा पक्ष कुटुंबाचाच पक्ष होता," अशी टीका जे. पी. नड्डा यांनी केली. तसेच भारतात भाजपा सोडून सर्व पक्ष कुटुंबाचे पक्ष झाले आहेत, असाही आरोप केला. ते बुधवारी (१७ मे) मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथे आयोजित 'मुंबई मोर्चा आघाडीच्या' बैठकीला संबोधित करत होते. जे. पी. नड्डा म्हणाले, "भाजपा सोडून देशातील सर्व पक्ष कुटुंबांचे पक्ष झालेत. कधीकाळी डीएमकेने प्रादेशिक अस्मितांचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र आज तो एका कुटुंबाचा पक्ष झाला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून वायएसआर काँग्रेस पक्ष तयार झाला, आज तो कुटुंबाचा पक्ष झाला आहे. केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती तो कुटुंबाचा पक्ष झाला आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंचा पक्षही कुटुंबाचाच पक्ष होता." "काँग्रेस संपली आहे" "उत्तर प्रदेशमध्ये भाजपा एका प्रादेशिक पक्षाबरोबर लढत आहे. काँग्रेस संपली आहे. त्यांच्याकडे कोणतीच विचारसरणी शिल्लक नाही. अखिलेश यादव अतिक अहमदसाठी उभे राहिले, त्यांची विचारसरणी कुठे राहिली. त्यांना स्वतःला आरशात बघायलाही लाज वाटत नसेल. बिहारमध्ये तेजस्वी-लालू-मिसा हा कुटुंबाचा पक्ष झाला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा असा कटुंबाचा पक्ष झाला. सर्व प्रादेशिक पक्ष हळूहळू कुटुंबाचे पक्ष होत चालले आहेत," असं मत जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केलं. व्हिडीओ पाहा : हेही वाचा : भाजपाच्या कार्यक्रमात जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीसांसमोरच बत्ती गुल; आशिष शेलारांनी अंधारातच केली भाषणाला सुरुवात! "मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल" "मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल हे आपल्याला निश्चित करायचं आहे. ज्यांच्याकडे अशी संघटनात्मक ताकद आहे त्यांनी इतर विचार करण्याची गरज नाही," असंही मत नड्डांनी व्यक्त केलं.