मुंबई : भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यातील ४५ जागा जिंकण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित केले आहे. शिवसेनेने लढविलेल्या आणि भाजपाची ताकद कमी असलेल्या राज्यातील ३८ मतदारसंघांमध्ये अधिक लक्ष दिले जाणार असून त्यापैकी १६ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपाने प्रभारींची नियुक्ती केली आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असून एमआयएम हा शिवसेनेचा ब संघ असल्याची टीका त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक तयारी, केंद्राच्या योजना यासह काही मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रदेश कार्यालयात बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी नेते बैठकीस उपस्थित होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, बारामती, शिरूर, सातारा या मतदारसंघांतून अन्य पक्षांचे व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. भाजपा खासदारांच्या काही मतदारसंघांमध्ये अधिक काम करावे लागणार आहे. अशा ३८ जागांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले असून त्यापैकी १६ मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भाजपाने १६ नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. आशीष शेलार यांच्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण-मध्य मुंबई प्रसाद लाड, कल्याण - संजय केळकर, पालघर- नरेंद्र पवार, दक्षिण मुंबई संजय उपाध्याय, बारामती - राम शिंदे आदी नेत्यांचा त्यात समावेश आहे. मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत जनकल्याणाच्या घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याचे काम भाजपाने हाती घेतले असून त्याबाबत मंत्री, खासदार व अन्य नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. आम्ही राज्यातील सर्व ४८ जागांवर पूर्ण ताकदीने लढू, असे फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभूत करण्याचे लक्ष्य आहे का आणि एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांच्या वक्तव्याबाबत विचारता फडणवीस यांनी एमआयएम शिवसेनेचा ब संघ असल्याचा आरोप केला. कोणाचाही पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करीत नसून भाजपाच्या पाचही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.