मुंबई: उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह हे देत असताना अयोध्येचा ५ जूनचा दौरा तूर्त स्थगित केल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भाजप प्रत्येक वेळी महाराष्ट्रातील नेत्यांना स्वार्थासाठी वापरून घेतो, भापजपने त्यांच्याबाबतीत असे का करावे, असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

भाजपाने त्यांच्या बाबतीत असे का करावे. भाजप महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतो. त्यातलाच हा प्रकार मला दिसतो आहे. यातून एक शहाणपण काही लोकांना आले, तर बरे होईल. यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे, महाराष्ट्राचे होते. आपण भाजपाकडून वापरले जात आहोत हे काही लोकांना उशिरा समजते. आम्हाला विचारले असते, तर राज ठाकरे यांना मदत केली असती, असे संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवे होते तर ते आम्ही नक्कीच दिले असते.