शिवसेना-भाजप हे सत्तेवर असलेलेच महानगरपालिका निवडणुकात वेगवेगळे लढत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे धैर्य शिवसेनेत नाही. उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा, असे आव्हान देत आम्ही मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. हे सरकार पडले तरी आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला १५० जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला.

भाजपने माफिया, खुनी लोकांना उमेदवारी दिली आहे. मतदार अशा गुंडांना मतदान करणार नाहीत. तर दुसरीकडे शिवसेना मोदींचा कट्टर विरोधक हार्दिक पटेलला मुंबईत आणते. त्यामुळे या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत सरकार पडेल. मध्यावधी निवडणुका होतील. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यास आम्हाला १५० जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबरील आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या दोन महिनेआधीच राष्ट्रवादीने आपली पहिली उमेदवारी जाहीर केली होती. आम्ही १७३ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. उर्वरित जागेवर काँग्रेस काय करते ते पाहू. काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
एमआयएम आणि भाजपचे लागेबंधे असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमआयएमचे प्रमुख ओवेसी हे मुळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यांच्या गावातील लोकांनीच त्यांना मतदान केले नाही. तिथे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना विशेष यश मिळणार नसल्याचे ते म्हणाले.