नुसतीच हजेरी लावून गेलेल्या वरुणराजाने आता चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेने बेभरवशाचा कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कृत्रिम पावसासाठीची प्रक्रिया जमिनीवरून करायची की आकाशातून, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ८ जुलै रोजी यापैकी एका पद्धतीवर शिक्कामोर्तब होऊन कृत्रिम पाऊस पाडण्याचा मुहूर्त निश्चित होईल. त्यामुळे पालिकेने दोन्ही प्रक्रियांसाठी निविदा मागवल्या आहेत.
कृत्रिम पावसासाठी पावसाच्या ढगांची आवश्यकता असत़े कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध नसल्यास पालिकेचे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहेत.
पावसाच्या ढगांवर विमानातून रासायनिक फवारणीद्वारे की जमिनीवरूनच प्रक्रिया करून तलावक्षेत्रात पाऊस पाडायचा असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. २००९ मध्ये मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या इस्रायलमधील मॅक्रॉट कंपनीला पालिकेने आमंत्रित केले होते. या कंपनीच्या प्रतिनिधींनी पालिका अधिकाऱ्यांसमोर कृत्रिम पावसाचे सादरिकरणही केले. ढगांवर रासायनिक फवारणी करण्यासाठी खास विमानाची आवश्यकता असून ते परदेशातून आणावे लागणार आहे. मात्र ही पद्धत प्रचंड खर्चीक आहे. त्यामुळे जमिनीवरूनच प्रक्रिया करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार पालिका अधिकारी करीत आहेत. त्यासाठी पुणे येथील आयआयटीएमची मदत घेण्यात येत आहे.