राजकीय पक्षांचा आणि उमेदवारांचा अभ्यास सुरू मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नऊ प्रभाग वाढणार असून त्याबाबतचा पुनर्रचना आराखडा पालिकेने मंगळवारी जाहीर केला. यामध्ये भायखळा, वरळी, परळ, दहिसर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर या परिसरात नऊ प्रभाग वाढलेले असले तरी सर्वच २२७ प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदललेल्या आराखडय़ाचा सर्वच राजकीय पक्षांनी अभ्यास सुरू केला असून इच्छुक उमेदवारांनीही आपला प्रभाग समजून घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याच्यादृष्टीने प्रभाग पुनर्रचना आराखडा प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिल्यानंतर मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी पालिकेने पुनर्रचना आराखडा प्रसिद्ध केला. सर्वच राजकीय पक्ष या आराखडय़ाचा अभ्यास करण्यात जुंपले आहेत. नक्की कुठे प्रभाग वाढले कसे वाढले यावर काय हरकती-सूचना नोंदवायच्या याकरिता राजकीय पक्षांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या आराखडय़ावर १४ फेब्रुवारीपर्यंत पालिकेच्या विभाग कार्यालयातील निवडणूक विभागात हरकती व सूचना देता येणार आहेत. काँग्रेसची अभ्यास समिती या पुनर्रचना आराखडय़ाचे आपण स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजप सरकारने प्रभागांची मोडतोड करून आपल्याला अनुकूल असे बदल केले होते, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तसे पत्रही निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे या पुनर्रचनेचे स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या पुनर्चनेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे १० जणांची समिती नेमली असून सात दिवसात या समितीने आपल्या सूचना व आक्षेप तयार ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. या समितीमध्ये अमीन पटेल, रवी राजा, मोहसीन हैदर, अशोक जाधव, आसिफ झकेरिया, सुरेश कोपरकर, झिशान सिद्दीकी, भूषण पाटील, अजंता यादव, चरणसिंग छप्रा यांचा समावेश असल्याचेही राजा यांनी सांगितले. शहर भागात शिवसेनेला लाभ नव्या पुनर्रचनेत भाजपच्या प्रभागांची मोडतोड होईल अशी भीती भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात होती. मात्र शिवसेनेचे प्राबल्य असलेले प्रभाग फोडून नवीन प्रभाग तयार करून शिवसेनेने एक प्रकारे राजकीय शहच दिला आहे. नव्या पुनर्रचनेत शहर भागात भायखळा, वरळी व परळमध्ये प्रभाग वाढवण्यात आले आहेत. शिवडी विधानसभा, वरळी विधानसभा व भायखळा विधानसभेत हे प्रभाग वाढवले आहेत. या विधानसभा मतदारसंघात जिथे पाच प्रभाग होते तिथे पाचही प्रभागांची मोडतोड करून सहावा प्रभाग तयार करण्यात आला आहे. शिवडी आणि वरळी हे दोन मतदारसंघ असे आहेत की इथे शिवसेनेचा कोणीही उमेदवार असला तरी तो जिंकून येतो. त्यामुळे शिवसेनेने या ठिकाणीच एक प्रभाग वाढवून आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भायखळा मतदारसंघात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा प्रभाग असून त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या तेथील आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही एक प्रभाग वाढवण्यात आला आहे. अन्य नवीन प्रभाग हे दहिसर, अंधेरी, वांद्रे, कांदिवली, कुर्ला, चेंबूर या परिसरात वाढणार आहेत. भाजपच्या उमेदवारांकडूनही अभ्यास भाजपच्या उमेदवारांनीही आपापल्या प्रभागांचा अभ्यास सुरू केला असून भाजपनेही आपले आक्षेप नोंदवण्याची तयारी केली आहे. प्रभागांच्या सीमा रेषा ठरवाताना रेल्वे मार्ग, नाला, पूल अशा नैसर्गिक सीमा ध्यानात घेतल्या जातात. मात्र यावेळी रेल्वेमार्गाच्या अलिकडे व पलिकडे असे प्रभाग देण्यात आल्याचे मत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केले.