मुंबई : कुर्ला पूर्व परिसरातील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीतील एक तीन मजली इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळली, तर लगतची दुसरी दुसरी इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी तिघांना राजावाडी, तर अन्य एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दहा जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रहिवाशांची सुखरुप सुटका केली. या दुर्घटनेत एकूण २३ जण जखमी झाले. त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये  अजय भोले पासफोर (२८), अजिंक्य प्रल्हाद गायकवाड (३४), कुशर प्रजापती(२०), सिंकदर राजभर(२१), अरविंद राजेंद्र भारती(१९) अनुप राजभर(१८), अनिल यादव(२१), श्याम प्रजापती(१८), लिलाबाई प्रल्हाद गायकवाड(६०),प्रल्हाद गायकवाड(६५),गुड्डू पासपोर(२२), राहुल कुमार माझी(२१),ब्रिज कुमार माझी(२२), पप्पू कुमार माझी(३५),महेश राम(४०),विनोद जाऊ माझी(३५) यांचा समावेश असून उर्वरित दोघांची ओळख पडलेली नाही.

या दुर्घटनेतील जखमींमध्ये चैहफ बसपाल (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मोर्य (२५), मनिष यादव (२०), देवकी बलिया(४२), प्रित बलिया(१७), दुधनाथ यादव(२२) यांचा समावेश आहे. यापैकी नऊ जखमींवर उपचार करुन घरी त्यांना पाठविण्यात आले. तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुर्घटनेतील अन्य एक जखमी अखिलेश माझी (३६) याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ढिगाऱ्याखाली १५ हून जास्त जण अडकल्याची शक्यता

सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे बाहेर काढण्याचे काम मंगळवारी रात्री उशीरापर्यत सुरू होते. या इमारतीमध्ये जवळपास ५० नागरिक राहत होते. मंगळवारी रात्री आठपर्यत या ढिगाऱ्याखालून ३३ जणांना काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अजूनही १५ हून जास्त नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.