मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया शुक्रवार, १३ जानेवारीपासून सुरू झाली असून या प्रक्रियेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे एकेका जागेसाठी ७० ते १०० उमेदवार हजर राहत आहेत. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहिसर येथील भावदेवी मैदानात सरळसेवा (वॉक इन सिलेक्शन) पद्धतीने होणारी ही भरती चार फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रविवारी सुट्टीमुळे ही भरती प्रक्रिया झाली नसली तरी शुक्रवार आणि शनिवारी उमेदवारांनी मोठा प्रतिसाद दिला. शुक्रवारी विशेष मागास वर्गासाठी तर, शनिवारी भटक्या जमाती (ब) या दोन वर्गासाठीची भरती प्रक्रिया पार पडली. पहिल्या दिवशी आठ जागांसाठी ६२२ उमेदवार उपस्थित होते. तर, दुसऱ्या दिवशी १४ जागांसाठी तब्बल १ हजार ४३८ उमेदवार हजर होते. यापैकी अनेक जण कागदपत्रे, वय, पात्रता या निकषांमुळे मैदानी चाचणीआधीच तर, काही जण मैदानी चाचणीतच बाद झाले. काही जण उंची, वजन या निकषांमध्ये बसत नव्हते. त्यामुळे अखेर १ हजार ४३८ पैकी ६४२ उमेदवारांनी चाचणी पूर्ण केली. शुक्रवारी ६२२ पैकी २८३ उमेदवारांनी आपली मैदानी चाचणी पूर्ण केली. भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहेत. तसेच, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीदेखील होणार आहे. पुढे निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर सहा महिने त्यांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण दिल्यानंतर सेवेत रुजू केले जाणार आहे. या वेळी १२० गुणांची मैदानी चाचणी, ८० गुणांची प्रमाणपत्र चाचणी होणार आहे. २०१७ प्रमाणेच या वेळीही भरती प्रक्रिया होत आहे.