लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : वाहनांच्या साधन सामग्रीच्या नावाखाली प्रत्येक वाहनामागे २५ हजार रुपये मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तीन मोटर परिवहन निरीक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभाग आणि उपप्रादेशिक विभाग कार्यालयांकडून अशाच प्रकारे एकूण १८७ वाहनांचे ४६ लाख ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून ती रक्कम एका गॅरेजमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहे.
परीक्षित पाटील, संतोष काथार, धनराज शिंदे या तिघांविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने राज्यातील परिवहन विभागांना वाहने दिली होती. या वाहनांच्या वितरणाची जबाबदारी आरोपी अधिकाऱ्यांवर होती. या वाहनांमध्ये साधन सामग्रीची(एक्सेसरी) कमतरता आहे. त्याची पूर्तता करण्याच्या नावाखाली प्रत्येक वाहनामागे २५ हजार रुपये द्या, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार हे मोटार परिवहन निरीक्षक आहे. परिवहन अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार एसीबीने केलेल्या पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट होताच ही कारवाई करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd