मावळ येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ईश्वरलाल खंडेलवाल यांनी ही याचिका केली असून न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सरकारला चार आठवडय़ांत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कर्णिक यांनी केलेल्या गोळीबारात आंदोलक महिलेचा मृत्यू झालेला नाही, असा निर्वाळा देत राज्य सरकारने त्यांना ताकीद देऊन सोडले होते. सरकारच्या या निर्णयात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर खंडेलवाल यांनी कर्णिक यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेद्वारे केली आहे. त्यांनी या याचिकेत सरकारच्या निर्णयालाही आव्हान दिले आहे.