११०० पैकी ३० टक्के बसमधील कॅमेरा बंद स्थितीत

 कॅमेरा बसवणाऱ्या कंपनीने फसवणूक केल्याचा दावा
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि एखादी गंभीर घटना घडल्यास त्याचा छडा लावण्यासाठी बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. बेस्टच्या ताफ्यातील सुमारे चार हजार बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसणे आवश्यक असताना सध्या फक्त ११०० बसगाडय़ांनाच हे कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच लाभले आहे. विशेष म्हणजे या ११०० पैकी ३० टक्क्यांहून अधिक बसगाडय़ांमधील कॅमेरे बंद असल्याचे स्पष्ट होत आहे.
व्हर्व या कंपनीशी करार झाल्याप्रमाणे बेस्ट उपक्रमातील सर्व बसगाडय़ांची आसने बदलण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. त्याशिवाय याच कंपनीला बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कंत्राटही देण्यात आले होते. २००७मध्ये झालेल्या या करारानंतर आठ वर्षांनी सर्व बसगाडय़ांची पाहणी केली असता बेस्टच्या ताफ्यातील तब्बल ४००० बसगाडय़ांपैकी फक्त ११०० बसगाडय़ांतच हे काम पूर्ण झाल्याचे समिती सदस्य सुहास सामंत यांनी निदर्शनास आणून दिले.
गेल्या तीन वर्षांत विविध प्रकरणांतील तपासासाठी पोलिसांनी १०० बसगाडय़ांधील चित्रीकरण तपासणीसाठी मागितले होते. मात्र त्यापैकी फक्त सहा-सात बसगाडय़ांमधील चित्रीकरणच पोलिसांना देणे बेस्टला शक्य झाले. परिणामी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामागील प्रयोजन साध्य होत नसल्याची टीका सामंत यांनी केली. यासाठी कुलाबा, धारावी, मालाड आणि शिवाजी नगर या चार आगारांमधील बसची तपासणी करण्यात आली.
या चारही आगारांमध्ये एकूण ४८५ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी ४५८ बसगाडय़ांमध्ये दोन्ही बाजूला, तर २४ गाडय़ांत एकाच बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ४८५ बसगाडय़ांपैकी ३३८ गाडय़ांतील कॅमेरे अजिबातच काम करत नसल्याचे या पाहणीत आढळले. तर फक्त १०९ बसगाडय़ांमध्ये दोन्ही कॅमेरे चालू असल्याचे लक्षात आले आहे. २००७मध्ये करार झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांत फक्त ११०० बसगाडय़ांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी बहुतांश कॅमेरे बंद आहेत, ही बेस्ट प्रशासनाची फसवणूक आहे, असा आरोप सुहास सामंत यांनी केला.
बेस्ट प्रशासन प्रवासी सुरक्षेसाठी उपाययोजना केल्याच्या वल्गना करते. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाचा हा दावा पोकळ असल्याची टीकाही त्यांनी केली. व्हर्व कंपनीने कराराचा भंग केला असून प्रशासनाने याची दखल घेत कंपनीने कारवाई करायला हवी, अशी मागणीही सामंत यांनी केली.