मुंबई : लोकलचे मोटरमन आणि गार्डवर नजर ठेवतानाच अपघात घडल्यास त्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका कंपनीला कॅमेरे बसवण्याचे कामही दिले आहे. येत्या एक ते दीड महिन्यात हे काम सुरू होणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाने कॅमेरे बसवण्याच्या प्रकल्पाला अगोदरच मंजुरी दिली  आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

लोकल चालवताना मोटरमनकडून चुकाही होतात. त्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही लोकल काहीशी पुढे नेणे अशा घटना घडतात. त्याचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघात होऊ शकतो.  त्यामुळेच अशा घटनांमागील कारणांचा शोध घेता यावा, रेल्वे प्रशासनाकडेही पुरावे उपलब्ध व्हावे,  तसेच ती होत असल्यास त्वरित नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आणता यावी, यासाठी खबरदारी म्हणून लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रियाही राबवण्यात येत होती.  यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे.  यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

कॅमेऱ्यांचा आणखी फायदा काय?

लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यानंतर ही यंत्रणा थेट रेल्वेच्या रेल्वे व्यवस्थापन यंत्रणा (टीएमएस)लाही जोडली जाईल. तेथील अधिकाऱ्यांकडूनही बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. लोकलवर होणारी दगडफेक, सिग्नल बिघाड, लाल सिग्नल ओलांडणे, तसेच अपघातही या कॅमेऱ्यात कैद होईल. त्यामुळे मोटरमन व गार्डशी संवाद साधून लोकलचे पुढील नियोजनही करता येणार आहे. शिवाय मोटरमन व गार्डच्या हालचाली, तसेच अपघात किंवा घटनेचेही चित्रण होईल.