“महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कातडी गेंड्याची आहे, असे आजवर इतक्यावेळा म्हटल्या गेले, की मी या नेत्यांपेक्षा अधिक संवेदनशील आहे असे गेंड्यालाही वाटू लागले आहे. इतके हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे.” अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच, “मनाला दुःख देणाऱ्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत आणि राज्य सरकारला या घटनांचे काहीच वाटत नाही. याचे सगळ्यात टोक म्हणजे परवा मालेगाव-अमरावतीमध्ये झालेल्या दंगली आणि त्या दंगलींची यांनी केलेले समर्थन हे आहे.” असं देखील चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्य्यांवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.

“होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचा हात”, संजय राऊतांचा ‘तो’ आरोप मान्य असल्याचं चंद्रकांत पाटलांचं विधान

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ ‘त्याने काय फरक पडतो?’ असा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन होणे हे संवेदनशील महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चाललंय. आज समाजात जो जो गुन्हा मानला जातो, तो तो महाविकासआघाडी सरकारमधील कुठल्यातरी मंत्र्यावर नोंदलेला आहे. ‘त्याने काय फरक पडतो?’ हा तुमचा गु्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे का? तुमचे गुन्हे, तुमची चौकशी आणि त्या चौकशीतून तुम्हाला अटक होणे, या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तुम्हाला बदलता आला नाही, तर तुम्ही जनतेचे रक्षण कसे करणार ? या सरकारला आता गेंड्याची कातडी असलेले सरकार असे म्हणणे म्हणजे गेंड्याचाही अपमान करण्यासारखे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कातडी गेंड्याची आहे, असे आजवर इतक्यावेळा म्हटल्या गेले, की मी या नेत्यांपेक्षा अधिक संवेदनशील आहे असे गेंड्यालाही वाटू लागले आहे. इतके हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे.”

तसेच, “भविष्यातील सर्व आंदोलनांची आणि कार्यक्रमांची दिशा आपण ठरवलेली आहे. आपण कोणतेही राजकारण न करता नागरिकांच्या हितासाठी एक चांगला विरोध पक्ष म्हणून योग्य भूमिका घेतली आहे. आपण केलेले अनेक आंदोलन यशस्वी देखील आहे.” असं सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, “जून मध्ये आपण एकत्र आल्यानंतर खूप घडामोडी घडलेल्या आहेत. जून मध्ये आपण एकत्र आलो त्यावेळी पंढरपुरची विधानसभा झाली होती. पंढरपुरची विधानसभा ज्याला आपण अमितभाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर ठोक के विजयी केली होती. त्याचा स्वाभाविकपणे उत्साह आपल्यामध्ये होता, त्याचवेळा राज्यातील जवळपास १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकी झाल्या. त्यात साडेसहा हजार गावांमध्ये सरपंच आपले झाले होते, अशा उत्साहाच्या वातावरणात आपण जूनमध्ये एकत्र आलो आणि भविष्यातील सर्व कार्यक्रमांची आंदोलनाची दिशा आपण ठरवली. आपण सगळ्यांनी त्यावेळी एकमेकांना नीट समजावून सांगितलं, की आपल्याला एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे. ती भूमिका जूनपासून आपण खूप चांगल्याप्रकारे बजावली. अगदी काल-परवा नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा जो कार्यक्रम आपण दिला तो केवळ आदल्यादिवशी रात्री ९ वाजता एका व्हिडिओ कॉलवर आपण दिला आणि दुसऱ्या दिवशी किमान २६-२७ मोठ्या शहरांमध्ये पुतळे जाळल्या गेले आणि कुठेही पुतळा जाळताना तो जाळला गेला नाही आणि अटक झाली, असं झालं नाही. एवढ्या कमी वेळात त्याचं नियोजन झालं. मग मोठ्याप्रमाणावर आपण पेट्रोल-डिझेलचे दर, व्हॅट हा महाराष्ट्र सरकारने कमी करावा म्हणून जो कार्यक्रम दिला, ती देखील जिल्हा केंद्रांमध्ये आणि तहसील केंद्रांमध्ये मिळून ४०० ठिकाणी ती निदर्शने झाली. निवेदनं झाली.”

एसटी कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या आहेत आणि सगळं नेतृत्व हे भाजपाकडे आलं आहे –

याचबरोबर एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “आज एसटी कामगारांच्या आंदोलनामध्ये सगळ्या एसटी कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या आहेत आणि सगळं नेतृत्व हे भाजपाकडे आलं आहे. त्यावर असहय्य झाल्याने अवघड स्थिती झाल्याने वारंवार संजय राऊत म्हणत आहेत, की यामध्ये भाजपाचा हात आहे. कुठल्याही अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात हात असेल तर आहे आमचा आम्ही काय तो अमान्य करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांची खूप भीषण स्थिती आहे. आपल्याला इथून जाताना त्याही विषयात आगामी काळात काय करायचं, याचा निर्णय करावा लागेल.”