सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानचे यंदाचे रंगसंमेलन २७ आणि २८ डिसेंबर रोजी डोंबिवलीत स. वा. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या वेळचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत. प्रा. वामन केंद्रे, विजय केंकरे, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, अजित भुरे या पाच ज्येष्ठ रंगकर्मीच्या हस्ते रंगसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे.     
उद्घाटन आणि पुरस्कार वितरण या दोन मुख्य सोहळ्यांबरोबरच नाटक, नृत्य, संगीत आणि साहित्य विषयक विविध कार्यक्रम आणि कलाकार व रसिक यांच्यात थेट संवाद घडवून आणणारे चहापान संमेलन या दोन दिवसांच्या संमेलनात असणार आहे.
२ नोव्हेंबरपासून नोंदणी
रंगसंमेलनाच्या स्वागतयात्री प्रवेशिकांची नोंदणी २ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर पहिल्या रांगेपासून ‘स्वागतयात्री’ प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत. चतुरंग प्रतिष्ठान डोंबिवली कार्यालय, रजत सोसायटी, तळमजला, तारा नाईक रुग्णालयामागे, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत येथे नोंदणी करता येणार आहे, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.