मुंबई : महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच चेंबूरची दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जिवाशी खेळत आहे, असे टीकास्त्र भाजप आमदार आशीष शेलार यांनी सोडले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप, विक्रोळी व चेंबूर येथील दुर्घटनांबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शेलार यांनी चेंबूर आणि अन्य दुर्घटना स्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आपत्तीत सापडलेल्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. मला यात राजकारण करायचे नाही, असे सांगून शेलार म्हणाले, महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काय करीत आहे? डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने धोक्याची पूर्वसूचना दिली होती का? सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय का घेतले नाहीत? शहरातील परिस्थिती पाहता महापालिका यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारसह सर्वांनीच मदत केली पाहिजे. महापालिकेने या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी शेलार यांनी केली.