मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प कसे, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची नेमकी काय भूमिका आहे, पुढचे धोरण काय असणार आहे, यावर चर्चा करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. सीमा भागात मराठी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांमागे भाजप असून, यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सीमाप्रश्नावर भाजप चुकीचे राजकारण करत आहे. कर्नाटक व केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने केंद्रातून कर्नाटकला काही सूचना येत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व त्यांचे मंत्री सातत्याने महाराष्ट्रविरोधी विधाने करीत आहेत. या दंडेलशाहीविरोधात राज्यातील जनतेत प्रचंड रोष आहे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्पष्ट व खंबीर भूमिका घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे का, असा प्रश्न पडतो, असे थोरात म्हणाले.