मुंबई: सनदी अधिकाऱ्यांना एकदाच कठीण परीक्षेला सामोरे जावे लागते. आम्हा राजकारण्यांना मात्र वारंवार कठीण परीक्षेला सामोरे जावे लागते. सरकारवर लोकांच्या अपेक्षांचा मोठा दबाव असतो. तरीही राजकारण्यांनी नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘हो’ म्हणायला शिकायला हवे असा मौलिक सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे अॅकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वानी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. असा गौरव होणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमचे कौतुक केले अशा शब्दांत गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या बिहारच्या शुभम कुमार, तिसरा क्रमांक मिळविलेल्या आणि सध्या मुंबईत नियुक्त असलेल्या अंकिता जैन, चौथा क्रमांक मिळविलेल्या यश जलुका, चौदावा क्रमांक मिळविलेल्या मुंबईस्थित करिश्मा नायर, राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मृणाली जोशी, या परीक्षेत ३७ वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळविलेल्या विनायक नरवडे, ४९ वा क्रमांक मिळविलेल्या मुंबईतील रजत उभयकर, ९५ वा क्रमांक मिळविलेल्या लातूरच्या विनायक महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले.