करोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाटय़ कलावंतांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. चित्रपटगृहे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

विविध परवान्यांचे नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटांमागे २५ रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी , विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये,  मिळकत कर आकारू नये,  अशा मागण्या यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत 

यावेळी खासदार, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

दरम्यान, चित्रपटगृहे, नाटय़गृहांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत. त्यानुसार, चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून, सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.