मुंबई/पुणे : ऐन उन्हाळय़ाच्या सुरूवातीला मुंबईसह कोकणपट्टय़ावर पावसाचे सावट असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. दिवसभर हवामान ढगाळ असल्याने वातावरणात काहीसा गारवा होता. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचे संकेत आहेत. सध्या तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. रविवारी विदर्भ, मराठवाडय़ात उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सांताक्रूझ येथे ३१.७ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान रविवारी नोंदवले गेले. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे एका अंशाची घट आणि एका अंशाची वाढ झाली होती. सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत दोन अंशांची वाढ झाली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मंगळवारी आणि बुधवारीही पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी गुरूवापर्यंत हवा कोरडी राहील. विदर्भात अनेक ठिकाणी अद्यापही कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्येही ४० अंश कमाल तापमान असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. मुंबई परिसरासह कोकणात सध्या कमाल तापमान सरासरीच्या जवळ आहे. बंगालमधील चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर आज सोमवारी चक्रीवादळात होणार आहे. दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही झाला. अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण आहे. मात्र, चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही.