राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. दरम्यान, या 'महामोर्चा'वर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चापेक्षा आमची कोकणातली सभा मोठी होती, असं ते म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. हेही वाचा - MVA Mahamorcha: “जर राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर…”, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; ‘महामोर्चा’तील सभेतून हल्लाबोल! काय म्हणाले मुख्यमंत्री? “आजच्या मोर्चासाठी तिन्ही पक्षांनी बैठका घेतल्या होत्या, मोठी तयारी केली. मात्र, त्याला किती यश मिळालं, हे आज सर्वांनी बघितलं आहे. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या कोकण्यातल्या सभेला यापेक्षा जास्त गर्दी होती”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. “ही सत्ता गेलेली हताश लोकं आहेत. त्यांच्यात रटाळवाणी भाषणं करण्याची आणि सरकारवर टीका करण्याची चढाओढ सुरू आहे. आम्ही गेल्या चार महिन्यात ज्याप्रकार काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - MVA Mahamorcha: “गेल्या १० वर्षांपासून उद्धव ठाकरेंची कॅसेट…”, देवेंद्र फडणवीसांची उपहासात्मक टीका! “मुंबईत भगव्या झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त” “दुर्देवाने आज मुंबईत भगव्या झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. हे चित्र चांगलं नव्हतं. हे चित्र आज संपूर्ण महाराष्ट्राने आणि मुंबईने बघितलं आहे. त्यामुळेच अनेक शिवसैनिक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. रोज पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळे आमचे सरकार भक्कम सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. या सरकारला केंद्राचाही भक्कम पाठिंबा आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.