शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पहिल्यांदाच विधान भवनामध्ये हजेरी लावली. सायंकाळी विधान भवनात येऊन ठाकरेंनी महाविकास आघाडीची बैठक घेतली. एकीकडे ठाकरे यांच्या या भेटीची चर्चा असताना दुसरीकडे सभागृहामध्ये एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव यांना टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> Eknath Shinde Poem on Ajit Pawar: “…आमचे मित्र अजित पवार”; सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंची कविता फडणवीसांनी केली पूर्ण

मंगळवारी विधानसभेच्या सभागृहात एका प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत नाही असं म्हटलं. “आजही मुख्यमंत्रीपद माझ्या डोक्यात नाहीच. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय,” असं शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना शिंदे यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख केला. “भुजबळसाहेब मी रात्री साडेतीन वाजेपर्यंत लोकांना भेटलो. त्यानंतर सकाळी सात वाजता मी ब्रिफिंग घेतलेलं आहे. त्यामुळे मला यात काही राजकारण करायचं नाही,” असंही शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “मी पक्षप्रमुख असतो तर…”; लांबत चाललेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांचं विधान

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. “देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही मी त्यांचं काम पाहिलं आहे,” असं शिंदे म्हणाले. पुढे बोलताना शिंदे यांनी इतक्या रात्रीपर्यंत कोणी मुख्यमंत्री लोकांना भेटतो का असा सवाल उपस्थित करत यापूर्वीचा अनुभव आहे आपल्याला असं सूचक विधान केलं. “तीन वाजेपर्यंत, चार वाजेपर्यंत कोणता मुख्यमंत्री लोकांना भेटतो? कधी भेटला होता का? आपण पाहिलं का? आपल्याला सगळा अनुभव आहे,” असं शिंदे म्हणाले. “मी एकच सांगू शकतो की आम्ही काम करणारी माणसं आहोत,” असंही शिंदे आपला मुद्दा मांडताना म्हणाले.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “मात्र त्यावेळेस जनता…”; सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सरकारकडून काही त्रुटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठ्या-चपाट्या आहेत. त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका आणि माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी विरोधकांना गर्भित इशारा दिला. एवढे बोलूनही हा ‘इशारा’ नाही, असा दावाही त्यांनी केला.

नक्की वाचा >> “खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

विरोधकांना गर्भित इशारा देताना तुमच्या सोबत काम केले आहे, याची आठवण करून देत आपल्याकडे सगळ्या चिठ्ठ्या-चपाट्या आहेत याकडे लक्ष वेधले. बदनामीचे राजकारण थांबवा. सत्ताधारी आणि विरोधक ही एकाच रथाची दोन चाके आहेत. काम करीत असताना सरकारकडून काही त्रृटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. आम्ही संवेदनशील आहोत. त्रुटी दूर करू, परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारम्ण आणून टीका करण्यात वेळ घालवू नका. मला कामातून उत्तर द्यायचे आहे. पण सहन करण्यालाही काही मर्यादा असते, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावले.