मुंबई : कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता निर्माण करून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे. तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून अंतिम सामंजस्य करारामध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज या दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुले हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी रामेश्वर नाईक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांना, विशेषतः रुग्णांना, तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.

बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होण्यास मदत

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वांतर्गत देण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील. महाराष्ट्रातील आरोग्यसेवांचा दर्जा उंचावण्यासही हातभार लागणार आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.