राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दक्षिण मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आज दाखल होणार आहेत. मानेचा त्रास होत असल्यानं मुख्यमंत्री हे रुग्णालयात दाखल होत असून पुढील दोन ते तीन दिवस ते उपचार घेणार आहेत. दरम्यान या काळात एक छोटीशी शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री यांनी जनतेला उद्देशून एक निवेदन प्रसारित केलं आहे आणि आपण नेमकं का रुग्णालयात दाखल होत आहोत याबाबतची वस्तुस्थिती सांगितली आहे. मुख्यमंत्री निवेदनात म्हणतात “माझ्या बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र ! गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच ! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो “, आपला नम्र…. उद्धव बाळासाहेब ठाकरे.

दोन दिवसांपूर्वी राज्यातील पालखी रस्त्याच्या भूमिपूजनाचा एक कार्यक्रम झाला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून सहभागी होतांना मुख्यमंत्री मानेला पट्टा लावून उपस्थित झाले होते. तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या मानेला होणाऱ्या त्रासाबद्दलची चर्चा सुरु झाली होती. आता प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल झाल्यावर, उपचाराचे सोपस्कार झाल्यावर मुख्यमंत्री पुन्हा एकदा केव्हा सक्रिय होतात याकडेही सर्वाचे लक्ष लागलेले असेल.