प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या सरकारी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे करण्यात आली आहे. रश्मी ठाकरेंनी झेंड्यासंदर्भातील आचारसंहितेचा भंग करत झेंड्याला सलाम केला नाही, असा मुद्दा उपस्थित करत अॅडव्हकेट जयश्री पाटील यांनी ही तक्रार केलीय. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय. "मी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं, या तिरंग्याच्या सन्मानासाठी किती लोकांना आपले प्राण गमावावे लागेल आहेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळेच जर सन्मान करत नसतील, राष्ट्रध्वजाला सलाम करायला लाज वाटत असेल तर हा मोठा देशद्रोह आहे. ही आचरसंहिता आहे. आपण राष्ट्रध्वजाला सलाम करुन त्याला सन्मान देतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी झेंड्याला सलाम केला नाही. त्यांनी केलेलं हे कृत्य आहे याची चौकशी केली पाहिजे, अशी तक्रार मी केलीय," असं अॅड. जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे. "मुख्यमंत्र्यांकडे लोक आदर्श म्हणून बघत असतात. अशावेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी त्यांच्या बाजूला उभ्या राहून राष्ट्रध्वजाला सलाम करायच्या वेळी रश्मी ठाकरे राष्ट्रध्वजाला सलाम करत नाहीत. अशावेळेस देशाच्या, महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो की खरंच यांना या तिरंग्याबद्दल प्रेम नाही का?, यांना तिरंगा पटत नाही का? की हे कोणत्या दुसऱ्या विचारधारेचे आहेत का? म्हणून याची सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मी ही तक्रार सीपी मुंबई यांच्याकडे दाखल केलीय. चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी केलीय," असंही अॅड. जयश्री पाटील म्हणाल्यात. पुढे बोलताना अॅड. जयश्री पाटील यांनी, आतापर्यंतची परंपरा आहे जेव्हा मुख्यमंत्री राष्ट्रध्वजाला सलाम करतात तेव्हा गांधी टोपी घालतात. मी म्हणतं नाही की तुम्ही टोपी घातलीच पाहिजे. कोणी गांधींच्या विचाराचे असू शकतात तर कोणी गोडसेच्या विचारांचे असू शकतात, असं म्हणत टोपी न घालण्यावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. तसेच जयश्री यांच्या या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाईल असं मत व्यक्त करणारे अॅड असमी सरोदेंवरही जयश्री यांनी टीका केलीय. "सरोदेंसारखे जे दलालीची कामं करतात, ज्यांना मी वकिलीचा कधी व सुद्धा म्हणताना पाहिलेलं नाही, ते या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाईल असं म्हणतातय. अरे कधी कायद्याचा अभ्यास केला का? माहितीय का देश काय असतो, देश प्रेम काय असतं?," असा प्रश्न जयश्री यांनी उपस्थित केलाय. "देशासंबंधातील प्रत्येक गोष्टी लिखित नसल्या तरी त्या पाळाव्या लागतात. रेड कार्पेटचं नाव घ्यायची तुमची लायकी आहे का? देशाच्या संसदेत जाऊन बघा रेड कार्पेट काय असतं ते. लायकीमध्ये रहायचं," असंही अॅड जयश्री म्हणाल्या आहेत.