मुख्यमंत्र्यांचे निर्देश; बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचाही आढावा

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्य़ांत सुरू असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

पोलिसांसाठी निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभुराज देसाई गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गृृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

पोलीस वसाहती पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थाने जागा उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाला भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. म्हाडाच्या भूखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकासावरही चर्चा झाली. महामंडळामार्फत काम पूर्ण झालेले प्रकल्प पोलीस विभागास तातडीने हस्तांतरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच प्रगतिपथावर असलेल्या ४९ प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.