मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात व झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन आठवडाभर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केले. नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’ असा भाजपचा कारभार आहे. निवडून आल्यावर लगेच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलेंडर १००० ते ११०० रुपये एवढय़ा किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून १ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही खेद वाटत नाही. संघटित व असंघटित कामगारांच्या समस्या व मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे, या संपाला काँग्रेसने पािठबा दिला आहे, असे पटोले यांनी सांगितले.