मुंबईत राहणा-या उत्तर भारतीय नागरिकांच्या सुविधेसाठी मुंंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्वतुळात उमटण्यास सुरवात झाली आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णायाच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना विचारात घेऊनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना सचिन सावंत म्हणाले की देशातील अन्य राज्यांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशातील असंघटीत कामगार आहेत. गुजरात, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं कार्यालय उघडण्याचा निर्णय का घेतला नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. देशात दरडोई उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे असंघटीत मजूर स्थलांतरीत होत आहेत. या मजुरांना उत्तर प्रदेश सरकारनं कोरोनाच्या काळात वा-यावर सोडलं होतं. मग आता अचानक त्यांची आठवण का झाली ? असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मुंंबईत राहणा-या उत्तर प्रदेशाच्या नागरिकांसाठी मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यालय मुंबईतील असंघटीत उत्तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल. अश्या प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. दुस-या राज्यात असलेल्या नागरिकांसाठी त्या राज्यात कार्यालय सुरू करणारं उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे. मुंबईत सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरीक राहतात. ही आगामी मुंबई महानगर पालीकेच्या निवडणुकीक निर्णायक ठरणारी व्होट बॅंक आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.